अॅड. सचिन मडोळा बनसोडे
Sunday 18 July 2021
महिला कारभारीण का नको?
Thursday 1 July 2021
शालेय शिक्षणमंत्री आता तरी डोळे उघडतील काय?
Tuesday 29 June 2021
आमदार कपिल पाटील मुंबई बंद पाडू शकतात?
मध्यंतरी आदरणीय अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांना भेटायला बोलावलं होतं. सोबत कपिल पाटील सर सुद्धा होते.
तेव्हा उद्धवजींना बाळासाहेब, 'बंद यशस्वी करण्यात मदत करा' असं म्हणाले.
त्यावर उद्धवजी म्हणाले, 'कपिलला सांगा तो मुंबई बंद पाडेल!'
कसं ते उद्धवजींनी बाळासाहेबांना सांगितलं.
खरं तर उद्धवजींच्या अशा बोलण्याला मोठी पार्श्वभूमी होती. मध्यंतरी तीन मोठ्या आंदोलनाने मुंबई ठप्प झाली होती. बेस्ट आंदोलन, महापालिका कर्मचारी आंदोलन, रिक्षा-टॅक्सी आंदोलन. ही आंदोलनं कामगारांचे नेते दिवंगत शरद राव यांच्या युनियनने म्हणजेच आता सगळं काम पाहत असणाऱ्या शशांक राव, रंगा सातवसे, रमाकांत बने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली होती. तेव्हा सरकार युतीचं होतं. बेस्ट कामगारांचा संप तर अनेक दिवस सुरू होता. मुंबईची दुसरी लायफलायन बेस्ट बंद होती. मुंबईकरांचा रोष वाढत चालला होता आणि आंदोलनाला पाठिंबा पाहून सत्ताधाऱ्यांचे धाबे दणाणले होते. पालिकेतील सत्ताधारी ऐकायला तयार नव्हते. तेव्हा यातला एक महत्चाचा दुवा ठरले आमदार कपिल पाटील. कपिल सर या युनियनचे प्रमुख सल्लागार आहेत. अनेक वर्षे कामगारांची आंदोलनं - मोर्चे, बंद त्यांनी जवळून पाहिले आणि हाताळले आहेत. याचा गाढा अनुभव पाठीशी होता. शेवटी सत्ताधाऱ्यांना नमाव लागलं आणि मागण्या मान्य कराव्या लागल्या. या वाटाघाटीत कपिल पाटील यांनी महत्वाची जबाबदारी पार पाडली. तेव्हा उद्धवजींना कळालं कपिल पाटील काय करू शकतात. सोबतच मुंबईतले शिक्षक आणि शिक्षक भारती संघटना (एकमेव शासन मान्य संघटना) यांनी जर ठरवलं तर सर्व शाळा सुद्धा कपिल सरांच्या एका हाकेवर बंद होऊ शकतात हे सुद्धा त्यांना चांगलं ठाऊक होतं.
आमदार कपिल पाटील मुंबई शिक्षक मतदार संघातून सलग तीन वेळेस मोठ्या मताधिक्याने निवडून येत आहेत. हा मतदार संघ यापूर्वी भाजप - संघाच्या ताब्यात होता. भाजपला हरवणं शिवसेनेसह सर्वच पक्षांना जमलं नाही. ते काम कपिल पाटील यांनी करून दाखवलं आणि ते सातत्य आजही आहे.
८ फेब्रुवारी २०२० रोजी वडाळाच्या स्पोर्ट कॉम्प्लेक्स स्टेडियम येथे कपिल पाटील यांच्या नेतृत्वात शिक्षकांचा राज्यस्तरीय मेळावा झाला. मैदानाच्या आत बाहेर गर्दी ओसंडून वाहत होती. शरद पवार आणि संजय राऊत या मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. आपल्या भाषणात संजय राऊत म्हणाले, 'आम्हाला वाटत होतं, मैदानं फक्त आम्ही शिवसेनेवालेच भरवू शकतो. पण कपिल पाटीलही मैदान भरवून दाखवू शकतात, मुंबई सारख्या ठिकाणी प्रचंड सभा घेऊ शकतात, हे आज त्यांनी दाखवून दिलं.'
कपिल पाटील सर काय करू शकतात हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलंय आणि पुढेही बघतील. कपिल सरांच्या आमदारकीला 15 वर्ष पूर्ण होताहेत. त्यांचे अभिनंदन आणि भावी वाटचालीस शुभेच्छा!
- अॅड. सचिन बनसोडे,
राज्य संघटक, छात्रभारती विद्यार्थी संघटना, महाराष्ट्र राज्य
#कार्यकर्ताआमदारकपिलपाटील
#कपिलपाटीलआमदारकीची१५वर्ष
Wednesday 5 February 2020
समर्थांच्या दरबारी गुंडागिरी खपवून घेणार नाही
अक्कलकोट मधील घटना आहे. काही दिवसांपूर्वी पत्रकार स्वामिनाथ हरवाळकर यांना स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे ट्रस्टी जन्मेजय भोसले यांच्याकडून मारहाण झाल्याचा आरोप आहे. पहिल्यांदा मी अशा कोणत्याही हिंसेचं समर्थन करणार नाही, मारहाणीचा निषेध करतो.
हरवळकर यांची बाजू घेण्याचा मुद्दा नाही. त्यांच्या चुकांचं समर्थन अजिबात नाही. त्यांनी काही चुकीचं केलं असेल तर त्यांच्यावर कायद्याच्या मार्गाने कारवाई झालीच पाहिजे. त्यासाठी या देशात कायदा अस्तित्वात आहे. जन्मेजय भोसले यांच्या सांगण्यावरून गुंडांनकरवी झालेलं ही मारहाण आहे. पण म्हणून समग्र मराठा समाजाने अन्याय केला असं होतं नाही. आजपर्यंत कोणी एका व्यक्तीने दलित समाजावर वर अन्याय केला याचा अर्थ संपूर्ण मराठा समाजाला चुकीचं ठरवण्याचे सुद्धा कारण नाही. यामुळे विनाकारण दलित आणि मराठा समाजामध्ये दरी निर्माण होण्याचं कारण नाही आणि ते कोणी करत असेल तर चुकीचं आहे. रयतेचे राजे छत्रपती शिवराय आम्हाला नेहमीच वंदनीय आहेत. त्यांचं नाव घेऊन राजकारण करणाऱ्यांकडून अशाप्रकारचे अन्याय अपेक्षित नाहीत.
RTI च्या माध्यमातून माहिती मागितली म्हणून हरवाळकर यांना झालेल्या मारहाणीचेही समर्थन करता येणार नाही. बाबासाहेबांनी देशाला घटना दिली. सर्वांना समान अधिकार दिले. आपल्या देशाने लोकशाही स्विकारली. तेव्हापासून राजेशाही संपली. याची जाणीव बाबासाहेबांचं नाव घेऊन चळवळ आणि राजकारण करणाऱ्यांना असायला हवी. तुम्ही कोणाला राजा, महाराजा म्हणत असाल तर तुम्हाला बाबासाहेबांनी दिलेली लोकशाही मान्य नाही का? कुणाची तरी हुजुरीगिरी करताना. राज दरबारी तुझ्या पेक्षा माझी निष्ठा श्रेष्ठ याचा दिखावा करताना. आपण समाजाला बाबसाहेबांनी दिलेल्या अट्रोसिटीला विरोध करत आहोत याची जाणीवही या पुढाऱ्यांना राहिलेली नाही. अट्रोसिटी हा कायदा फक्त बौद्ध समाजासाठी मर्यादित नसून समस्त दलित वर्गासाठी आहे. आपल्याला आंबेडकरी चळवळीचे स्वरूप जर व्यापक बनवायचे असेल तर दलित या शब्दाखाली मोडणाऱ्या सर्व समाजाला सोबत घ्यावं लागेल. अन्यथा एकजातीय चळवळ जो काही आरोप आजवर आपल्यावर होत आली आहे तो यानिमित्ताने आणखीन घट्ट होईल.
अट्रोसिटी कायदा हे आपल्या समाज बांधवांसाठी संरक्षण आहे आणि तुम्ही जर गुन्हा नोंद करून घेऊ नका म्हणून मागणी करत असाल तर तुम्ही समाजाशी प्रतारणा करत आहात. अट्रोसिटी कायद्याचा अंमलबजावणीचे आकडे 5% च्या वर आपल्याला दिसणार नाहीत, असं असताना आपल्याच समाजातील पुढारीच जर देवाच्या आणि दानधर्माच्या नावाखाली अमाप संपत्ती कमावणाऱ्यांचे समर्थन करत असतील तर याचं खूप वाईट वाटतं. मी म्हणत नाही तुम्ही हरवळकर यांच्या पाठीशी उभं राहावं पण अत्याचार करणाऱ्यांचं समर्थन सुद्धा करू नका. अक्कलकोट मध्ये आंबेडकरी चळवळीचा झेंडा घेऊन जे कोणी माझे बांधव लढतायत ते खूप सक्षम आहेत, दिवसाची रात्र करून तुम्ही चळवळीचं काम करताय याची सुद्धा मला जाणीव आहे. परंतु आपण जी चळवळ चालवताय ते स्वाभिमानाचं प्रतीक असायला पाहिजे गुलामीच नव्हे. म्हणून त्यांनी स्वार्थासाठी कुणाला पाठिंबा न देता अन्यायाच्या विरोधात उभं राहिलं पाहिजे. चुकीच्या भूमिकांमुळे आपल्या संरक्षणाच्या असलेल्या कायद्याची जर चुकीचं चर्चा होत असेल तर जाहीररीत्या चर्चा घडवून आणणे सुद्धा आपलं कर्तव्य आहे. आपल्या समाजावर उच्चवर्णीय आणि सरंजामदारानी आजपर्यंत केलेला अन्याय अत्याचार विसरू नका. तुम्ही जर अशा परिस्थितीत अशी चुकीची भूमिका घेताय तर येणारा काळ तुम्हाला माफ करणार नाही. स्वतःच्या स्वार्थापोटी समाजाला वेठीस धरणे योग्य नाही.
बाकी कायद्यापुढे राजा आणि रंक सगळे सारखेच.
- अॅड. सचिन बनसोडे, कान्होळी, ता. अक्कलकोट
राज्य संघटक, छात्रभारती विद्यार्थी संघटना
bansodesachin358@gmail.com
9594827100